मुंबई : ‘भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी, आठ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध केलेले संकल्पपत्र हे शेतकरी, गावकरी, युवा, महिला, गरीब, अनुसूचित जाती- जमाती, व्यापारी, उद्योजक अशा सर्व समाजघटकांना सोबत घेऊन नवा भारत घडविणारे संकल्प पत्र आहे,’ अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवा भारत घडविण्याचे ध्येय साध्य करणारे आणि त्यामध्ये सर्व समाजघटकांना सोबत घेणारे हे संकल्पपत्र आहे. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि संकल्पपत्र समितीचे अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांचे मी अभिनंदन करतो.’
‘छोट्या शेतकऱ्यांना पेन्शन, किसान सन्मान निधी योजनेचा सर्व शेतकऱ्यांना लाभ, किसान क्रेडिट कार्डावर एक लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज, देशातील सर्व रखडलेल्या सिंचन योजना पूर्ण करणार, शेती आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी २५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अशी संकल्प पत्रातील आश्वासने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी उपयोगी असून, ग्रामीण भारताचे चित्र बदलून टाकणारी आहेत. रेशन दुकानांच्या व्यवस्थेत स्वस्त गहू- तांदूळ मिळणाऱ्या कुटुंबांना दरमहा तेरा रुपये प्रतिकिलो दराने साखर देण्याचे आश्वासन गरिबांना मदत करण्याबरोबरच राज्यातील साखर उद्योगाला वाचविणारे आहे. छोट्या व्यापाऱ्यांना पेन्शन, व्यापाऱ्यांच्या कल्याणासाठी राष्ट्रीय मंडळाची स्थापना, शेतकऱ्यांप्रमाणे व्यापाऱ्यांसाठी मर्चंट क्रेडिट कार्ड, २०२२ पर्यंत प्रत्येकाला राहण्यास पक्के घर, वीज, नळाचे पाणी आणि गॅस कनेक्शन ही आश्वासने समाजाच्या सर्व घटकांची काळजी घेणारी आहेत,’ असेही दानवे यांनी नमूद केले.
ते म्हणाले, ‘पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात १०० लाख कोटींची गुंतवणूक, राष्ट्रीय महामार्ग दुप्पट करणे, रेल्वे संपूर्ण ब्रॉडगेज करून विद्युतीकरण, लघु व मध्यम उद्योगांच्या क्षेत्राला प्राधान्याने एक लाख कोटींचा कर्जपुरवठा, सर्व शहरांना पाईपने गॅस पुरवठा, ५० मोठ्या शहरात मेट्रो, शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीवर भर या आश्वासनांच्या पूर्ततेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचा झपाट्याने विकास होईल आणि मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल. अयोध्या येथे भव्य राम मंदिर उभारण्यास भाजपा वचनबद्ध आहे व त्याचा उच्चार जाहीरनाम्यात केला आहे.’